या दहशतवादी तळांवर काय चालायचे?   

पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय सैन्याने मंगळवारी मध्यरात्री पाकिस्तानमधील मुजफ्फराबाद, कोटली, गुलपुर, भिंबर, सियालकोट, चक अमरू, मुरीदके, बहावलपूर येथील नऊ दहशतवादी तळांवर हवाई हल्ले केले.  या तळांवर नेमके काय चालायचे? 
 
मुझफ्फराबाद : येथील शवाई नालाह आणि सय्यदना बिलाल या तळांवर हवाई हल्ला करण्यात आला. शवाई नालाह हे व्याप्त काश्मीरमधील दहशतवादी प्रशिक्षण केंद्र होते. याठिकाणी हिजबुल्लाच्या दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिले जात होते. भारतात घुसखोरी करण्यासाठी हा महत्त्वाचा मार्ग मानला जातो. २०२४ मध्ये गुलमर्गमधील सोनमर्ग येथे झालेल्या हल्ल्यांतील आणि अकडच्या पहलगाम हल्ल्याशी संबंधित लष्कर-ए-तोयबाच्या दहशतवाद्यांना या ठिकाणी प्रशिक्षण देण्यात आले होते.  तर सय्यदना बिलाल हा तळ  शस्त्रास्त्रांचा डेपो, स्फोटके साठवणूक आणि जंगल प्रशिक्षण केंद्र म्हणून काम करणारा जैश-ए-मोहम्मदचा स्टेजिंग एरिया होता. 
 
मुरीदके : मुरीदके येथे लष्कर-ए-तोयबाचे मुख्यालय आहे. येथेच २६/११ च्या झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा कट रचला गेला होता. हे एक जमात-उद-दवाच्या नावाखाली चालणारे कट्टरवादी केंद्र आहे. लष्कर-ए-तोयबा येथून आर्थिक, धार्मिक आणि शस्त्र प्रशिक्षण मोहीमा चालवते. भारतात मोठ्या घातपाताच्या योजना याच ठिकाणाहून आखल्या जातात. २००८ च्या मुंबई हल्ल्यातील गुन्हेगार डेव्हिड हेडली आणि अजमल कसाब यांनाही याच ठिकाणी प्रशिक्षण देण्यात आले होते. 
 
सियालकोट : येथील मेहमूना जोया कॅम्प हा भारत आणि पाकिस्तान सीमेवरील दहशतवादाचा मोठा तळ आहे. हे ठिकाण भारतातील जम्मू सीमेच्या जवळ आहे. त्यामुळे दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी आणि शस्त्रास्त्रांची ने-आण करण्यासाठी हे महत्त्वाचे ठिकाण आहे. या भागाला दहशतवादी हालचालींचे केंद्र असे म्हटले जाते.  
 
कोटली : येथील मस्कर राहिल शाहिद आणि मरकझ अब्बास या दोन तळांवर हल्ला करण्यात आला. मस्कर राहिल शाहिद हा तळ नियंत्रण रेषेपासून ३० किमी अंतरावर होता. लष्कर-ए-तोयबाच्या दहशतवाद्यांना या ठिकाणी प्रशिक्षण देण्यात येत होते. २०२३ मध्ये पूंछ हल्ल्याशी आणि २०२४ मध्ये  तीर्थयात्रेतील बस हल्ल्यातील दहशतवाद्यांनी या ठिकाणी प्रशिक्षण घेतले होते. तर मरकझ अब्बास हा तळ नियंत्रण रेषेपासून १३ किमी अंतरावर होता. लष्कर-ए-तोयबाच्या दहशतवाद्यांना या ठिकाणी आत्मघातकी हल्ल्यांचे प्रशिक्षण देण्यात येत होते.  
 
बहावलपूर : येथील मरकड सुबाहान अल्ला हा जैश-ए-मोहम्मदचा सक्रिय तळ आहे. तो मसूद अझहरचा गड मानला जातो. पठाणकोट व पुलवामा हल्ल्यांतील दहशतवाद्यांना या ठिकाणी प्रशिक्षण देण्यात आले होते. दहशतवाद्यांची भरती आणि प्रशिक्षण केंद्र या ठिकाणी चालते.
 
भिंबर : येथील मरकझ अहले हदीस या तळावर दहशतवाद्यांना शस्त्रे चालवणे,  छोटे-मोठे बॉम्बस्फोट तसेच जंगलात राहण्याचे प्रशिक्षण दिले जात होते. दहशतवादी घुसखोरीसाठी बर्नाला येथील भिंबर हे ठिकाण महत्त्वाचे आहे. भारतीय लष्कराच्या  मोहिमांमधील अनेक हालचाली याठिकाणी टिपल्या गेल्या होत्या. त्यामुळे दहशतवाद्यांच्या या ठिकाणावर हल्ला करण्याचा निर्णय घेतला गेला. 
 
चक अमरू : दहशतवाद्यांना पंजाबमधून भारतात प्रवेशाचा मार्ग चक अमरू येथून आहे. शस्त्र व दहशतवादी भारतात पाठवण्यासाठी वापरले जाणारे हे ठिकाण आहे. तसेच ड्रोन व चोरटा व्यापार करण्यासाठी या ठिकाणाचा वापर होत असल्याची माहिती होती.  
 
गुलपूर : हे दहशतवादी प्रक्षेपण स्थळ म्हणून ओळखले जाते. या ठिकाणावरून भारतात शस्त्रास्त्रे व दहशतवादी घुसवले जातात. गुप्तचर अहवालानुसार, याठिकाणी दहशतवाद्यांना नियंत्रण रेषा पार करण्यासाठी सज्ज ठेवले जाते.
 

Related Articles